राज्यसभेच्या आठ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक   

नवी दिल्ली : राज्यसभेच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत आहे. या जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक घेण्यात येईल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी केली.यामध्ये आसाममधील दोन आणि तामिळनाडूतील सहा जागांचा समावेश आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
आसाममधील बिरेंद्र प्रसाद बैस्य (भाजप) आणि मिशन रंजन दास (भाजप) यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे, तामिळनाडूतील अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल काची), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), एम. षणमुगम (डीएमके), पी विल्सन (द्रमुक) आणि वायको (एमडीएमके) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या निवडणुकीची अधिसूचना २ जून रोजी काढली जाईल, असेही आयोगाने सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका घ्या

नॅशनल कॉन्फरन्सची मागणी

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका घेण्याची विनंती नॅशनल कॉन्फरन्सने सोमवारी मुख्य निवडणूक आयोगाला केली. विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, हेही निदर्शनास आणून दिले.निवडणूक आयोगाने चार राज्यांमधील विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. परंतु, त्यात बडगाम आणि नागरोटा विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही, असेही सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने निदर्शनास आणून दिले आहे.
 
जम्मू आणि काश्मीरला राज्यसभेत प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे. त्यामुळेच, जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती आपण केली असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्य प्रवक्ते तन्वीर सादिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले.जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, राज्यसभेच्या जागा अजूनही रिकाम्या आहेत, असेही ते म्हणाले.
 
बडगाम आणि नागरोटा वगळता सर्वत्र पोटनिवडणुका होत आहेत. फक्त जम्मू आणि काश्मीरमध्येच विलंब का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विधानसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला यांनी गंदरबल आणि बडगाम मतदारसंघातून विजय नोंदविला होता. त्यानंतर, गंदरबलची जागा राखताना बडगामची जागा सोडली होती. त्यामुळे, ही जागा रिकामी आहे. तर, भाजप नेते आणि विद्यमान आमदार देवेंदर राणा यांच्या निधनामुळे नगरोटाची जागा रिकामी झाली होती.
 

Related Articles